"बुचाची फुले" ही पत्रमालिका बुक हंगामा संचालित "न लिहिलेली पत्रे" या फेसबुक पेजवर २०१७ आणि २०१८ दरम्यान दर शनिवारी प्रसिद्ध होत असे. औरंगाबाद येथे झालेल्या 'दुसऱ्या नुक्कड डिजिटल साहित्य संमेलनात" लोकप्रिय मालिकेसाठी "बुचाची फुले"ला ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
वाचकहो ,
जवळ जवळ दीड वर्षे चालू असलेल्या या प्रवासाचा मी व्यक्तिशः खूप आनंद घेतला.
ही पत्रमालिका लिहायला घेताना धाकधूक होती कारण इथे मध्यवर्ती सूत्र असे काही नव्हते.
असलेच तर फक्त दोन जीवांचा आठवणींचा प्रवास, त्यांच्यातले हितगूज होते. मग बुचाची फुले हेच नाव का?
तर, बालपणीपासून मी जिथे ज्या जागी गेले तिथे मला बुचाची झाडे भेटत गेली, त्या फुलांचे घोस पाहून
आणि त्यांचा दरवळ हुंगला की नेहेमी वाटायचे, यांचे आणि आपले कुठल्यातरी जन्माचे नाते आहे.
मी त्यांच्याशी संवाद साधू शकते. थोडक्यात ही फुले "माझी" आहेत.
तसाच हा संवाद माझा माझ्याशी आहे, म्हणून पर्यायाने आणि ओघाने "बुचाची फुले" हेच नाव मनात आले.
वाचकांनी या मालिकेला भरघोस प्रतिसाद, प्रतिक्रिया दिल्या.
काहींशी अतिशय जवळचे बंध निर्माण झाले.
'शनिवारी पत्र नसले तर चुकल्यासारखे वाटते' अशीही प्रतिक्रिया आली तेव्हा आत काहीतरी हलले
आणि जबाबदारी वाढली असे वाटले.
मी त्यात किती खरी उतरले माहीत नाही, पण हा संवादु "शब्देण" होता
त्यामुळे शब्दांची आणि वाचकांची मी शतशः ऋणी आहे.
विक्रम काका आणि न लिहिलेली पत्रे यांच्या ऋणात मी नेहेमीच आहे आणि असेन.
काका नसते तर हा साठीचा टप्पा मी गाठला नसता. त्यामुळे विशेष लोभ
अखेर, बुचाची फुले सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देत राहोत असे म्हणून मी थांबते.
स्नेहांकित,
नेहा
No comments:
Post a Comment