Search This Blog

Thursday, November 29, 2018

क्षण

मनाच्या निर्वात पोकळीत
जपलेले काही क्षण
जेव्हा मुजोर होतात
तेव्हा त्यांना खुशाल
स्वतःच बोट धरून
एक निर्जन बेटावर सोडून यावं

कुणी सांगावं....

देहाच्या सांदी-कोपऱ्यात
एक मिणमिणती पणती
निश्चल उभी असेल
येणाऱ्या क्षणांना
'इथे अजून उजेड आहे'
हे कळण्यासाठी !

- नेहा लिमये

#randomthoughts

Saturday, November 24, 2018

ऑनलाइन लिहिण्याची गोष्ट

सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवर लिहीत राहणे, ही सोपी गोष्ट नाही. त्यातही लिहिणारी स्त्री असेल, तर तिच्या व्यक्त होण्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स येऊ शकतात किंवा लिखाणावर झालेली जहरी टीकाही सहन करावी लागू शकते.
- नेहा लिमये
(पूर्वप्रसिद्धी :- महाराष्ट्र टाइम्स - मैफल पुरवणी - १३ एप्रिल २०१८)
https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/the-thing-to-write-online/articleshow/63739217.cms
दोन वर्षांपूर्वी मी माझी कथा एका फेसबुक ब्लॉगला पाठवली होती. ती पाठवताना मी लिहू शकले, एवढेच डोक्यात होते. ती कितपत पोहोचेल याचा विचारही मनाला शिवला नव्हता. ज्यांना पाठवली, त्यांनी त्या कथेवर एक शॉर्टफिल्म बनवून त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केली आणि त्यानंतर मित्र -मैत्रिणींपासून कित्येक अनोळखी व्यक्तींचे मेसेज, कंमेंट्स आल्या. एक दिवस व्हाट्सअॅपवर मला ओळखीतल्या सिनिअर व्यक्तीने मेसेज पाठवला. त्यांच्या मित्राच्या आईने (वय ८०) अमेरिकेत हा व्हिडिओ पहिला आणि 'मला ही कथा माझीच वाटते,' असे कळवले होते, म्हणून त्यांनी माझे कौतुक केले. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप बोलकी होती; कारण त्या दिवशी मला सोशल मीडिया किती प्रभावी माध्यम आहे आणि ते एका झटक्यात किती दूरवर पोहोचू शकते, हे फार प्रकर्षाने जाणवले.
'ती सारखीच पोस्ट टाकत असते, एवढा वेळ कसा मिळतो देव जाणे,' 'कसे सुचते हो तुम्हाला लिहायला? वेळ कधी काढता एवढा?' 'मला आवडते ती लिहिते ते. बोल्ड असले, तरी खरे तेच लिहिते,' सोशल मीडियावरील लेखनावरच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया. एक स्त्री म्हणून मी विचार करू लागले, की आम्हा स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा मोह का पडत असेल?
पूर्वीच्या काळात बायका दुपारच्या वेळी एकमेकींशी गप्पा मारत किंवा भिशी, हळदी-कुंकू वगैरे कार्यक्रमात एकमेकींची विचारपूस करत. अगदी आतले, मनातले दुखले-खुपले लिहायला खासगी डायरी कामी येत असे. त्यानंतर ऑर्कुट, जीटॉक मेसेंजर आणि नंतर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, ब्लॉग, ई-बुक्स यांनी जसजसा स्त्रियांच्या जीवनात चंचुप्रवेश केला, तसतसा हा व्यक्त होण्याचा वेग आणि त्याची गरज यांचा आवाका वाढताना दिसू लागला. यापैकी किमान एकही माध्यम न वापरणारी स्त्री आताशा विरळाच, एवढी ही माध्यमे स्त्रीजीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. यामागचे साधे आणि सोपे कारण म्हणजे नोकरी, व्यवसाय, घरकाम सांभाळून आपापल्या सोयीने येथे व्यक्त होता येते. प्रवास करताना, ऑफिसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, कुटुंबाबरोबर असताना, कधीही, कोठेही हे माध्यम सहज हाताशी उपलब्ध असते. लिखाणाला साहित्यिक मूल्य असलेच पाहिजे, हे प्रमेय येथे सहज बाजूला पडते. एका ओळीची पोस्ट ते दोन ओळी, चारोळी, हायकू, ५०० शब्दांची ब्लॉगपोस्ट, दीर्घ मुक्तछंद, फोटो पोस्ट, लघुकथा, दीर्घकथा एवढी 'अभिव्यक्ती स्पेस' ही माध्यमे सहज उपलब्ध करून देतात. परदेशात गेल्यावर विखुरलेले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी परत जोडण्याचे काम ही माध्यमे स्त्रीसाठी बजावतात, तसेच लिहायला लागल्यानंतर आपल्या विषयाशी जोडून घेणारे समविचारी, सहवेदना, सहसंवेदना असलेले सुहृद तिला येथे मिळतात.
स्त्रियांच्या व्यक्त होण्यामागे हे एवढेच कारण नाही. मुळात बोलणे, विचारणे, बारीसारीक तपशील नोंदवणे, त्यावर प्रतिक्रिया हवी असणे ही स्त्रीची मूलभूत गरज. या व्यक्त होण्यात कधी स्वतःवर, तर कधी दुसऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्धची चीड, घुसमट असू शकते. कधी स्वतःमधली कलात्मकता अभिव्यक्त करण्याची आंतरिक ऊर्मी असू शकते. जाता जाता आपले ज्ञान इतरांना वाटण्याची सहज वृत्ती असू शकते किंवा वाचकांचे/स्वतःचे निव्वळ मनोरंजन करणे, एवढेच साध्य असू शकते. स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे पूर्वीच्या काळी स्त्रियांसाठी वर्ज्य होते; अजूनही आहे. त्यावर लिहिणे खूप लांबची गोष्ट झाली. आता ओपन प्लॅटफॉर्ममुळे पोस्ट टाकून किंवा ट्विट करून सरळ किंवा आडमार्गाने लोकांना खासगी आयुष्याशी जोडून घेणे सहज शक्य झाले आहे. वेळप्रसंगी फेक अकाउंट उघडून, आपली ओळख जाहीर न करता संवाद साधणे, हेदेखील या माध्यमांमुळे शक्य झाले आहे. आपल्या दुःखावर या मार्गाने अलगद फुंकर बसणे किंवा लाइक्स, कंमेंट्स, शेयर्स यांतून ऊर्जा आणि प्रेरणा मिळणे, हे दोन्ही घटक स्त्रियांना समाज माध्यमांवर सातत्याने लिहिते ठेवतात.
शेवटी कोणतेही लेखन हे अनुभवातूनच जन्म घेते. स्त्रियांचे लिखाण तरी याला अपवाद कसे असेल? स्त्रियांच्या अनुभवविश्वातूनच लेखनासाठीचा कच्चा माल मिळतो, तरीही स्त्रियांच्या येथील लेखनाबाबत खूप गैरसमज आहेत. मला माझ्या एका मित्राने विचारले होते, 'तुम्ही बायका रोमँटिक कविता, गझल किंवा मग अन्याय, अत्याचार यावरच का लिहिता नेहमी? तेही लिहा; पण वेगळे विषयसुद्धा हाताळा ना.' मी तेव्हा इरेला पेटून त्याला तासभर फेसबुकवर फिरवून आणले. विविध पोस्ट्स दाखवल्या, तेव्हा त्याचे समाधान झाले. त्याचा गैरसमज दूर झाला. स्त्रिया करत असलेल्या विपुल लेखनाची आणि त्यामागच्या ऊर्मीची ही काही उदाहरणे,
वेट लॉस (आधी/नंतर), बॉयफ्रेंड/नवऱ्याबरोबर फीलिंग वंडरफुल, सॉफ्ट फ्लर्टिंग, पार्टी फोटो, चेक इन (हॉटेल/विमानप्रवास), मुलांचे स्पर्धा परीक्षा किंवा क्रीडा क्षेत्रातले यश, श्रद्धांजली/ वाढदिवस/ सकाळ-रात्रीच्या शुभेच्छा, विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केलेले लेखन, पुस्तकाचे मार्केटिंग, लेखनाचे ब्रँडिंग, उद्योग-व्यवसायाचे प्रमोशन, समाजजागृती, सामाजिक संस्थांचे काम, आर्थिक मदत गोळा करणे, करिअर मार्गदर्शन, मानसोपचार-हीलिंग, इव्हेंट कव्हर करण्यासाठी निमंत्रण पत्रिकेसारखा वापर करणे इत्यादी. अनुभव किंवा ज्ञानाचा उपयोग करून देण्यासाठी केलेल्या लेखनामध्ये आयुर्वेद, पर्यावरण, कला, राजकारण, नाट्य/चित्रपट/कला समीक्षा, गुन्हेगारी, फॅशन, व्यायाम, आहार व पाककृती, आध्यात्म, आरोग्यविषयक. कविता, गझल, ललित, लघुकथा, लघुत्तम कथा, दीर्घ कथा, कादंबरी, विचारधन, वृत्तपत्रात छापून आलेले स्वलेखन, वगैरे साहित्यिक लेखनही असते.
सध्या मुक्त लेखनाचा ट्रेंड गाजतो आहे. यामध्ये स्वयंपाकघरातील ओट्यापासून ते कॉर्पोरेट किंवा नाट्य-चित्रपट व्यवसायातल्या संघर्षापर्यंत, मुलांच्या शाळांपासून ते स्त्रियांच्या लैंगिक गरजांबद्दल अथवा शोषणाबद्दल / त्याविरुद्ध आवाज उठवणारे, दुर्लक्षित किंवा पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची ओळख करून देणारे, असे आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारे लेखन. मुळात बाई लिहिते आणि बाई बोल्ड विषयांवर लिहितेस अशा विधानांना या स्त्रिया पद्धतशीरपणे खोडून काढतात. मुख्य म्हणजे अशा लिखाणावरच्या स्त्रियांच्या प्रतिक्रिया तितक्याच वाचनीय असतात आणि त्या स्वतंत्रपणे पोस्टचा विषय होऊ शकतात. एकमेकींपासून प्रेरणा घेत स्त्रियांचे येथील लिखाण दिवसेंदिवस जास्त मोकळे, थेट होताना दिसते. ही माध्यमे क्षणात लोकप्रियता मिळवून देणारी असली आणि त्यांची व्याप्ती कल्पनेच्या पलीकडली असली, तरी नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी.
१. विषयाला बंधन नसले, तरी त्या विषयावरून लेखिकेला जोखणे आणि तिच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करणे किंवा तिला नकोशा प्रतिक्रियांचा सामना करावा लागणे. तिने लैंगिकता किंवा त्यासंबंधित विषयावर किंवा धर्मावर लिहिले असल्यास हा प्रकार सर्रास आढळतो. यात आरोप करताना अतिशय शिवराळ भाषा वापरली जाते. याची मानसिक तयारी / खंबीरपणा नसेल, तर बरेचदा पोस्ट मागे घेणे, डिलिट करणे, जाहीर माफी मागणे हे प्रकार घडू शकतात.
२. लिहिलेले वाचकापर्यंत पोचल्यानंतर मिळणाऱ्या लाइक्स, कंमेंट्स, शेयर्स यामध्ये गुंतल्यास अहंकार वाढतो किंवा नैराश्य तरी येते. त्या कंमेंट्समधून वाचकाशी निर्माण होणारे बंध एका मर्यादेपर्यंत ठेवणे आणि त्यात गरजेपेक्षा जास्त न अडकण्याचे भान स्त्रीला सतत बाळगावे लागते. यात तिचे मानसिक, शारीरिक, सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकते.
३. एखादी पोस्ट केल्याकेल्या पुरुषवर्गाच्या फ्रेंड रिक्वेस्ट येणे, त्या स्वीकारल्यानंतर त्यांनी इनबॉक्समध्ये येऊन ओळख वाढवायला बघणे, तिच्या मोकळेपणाचा गैरफायदा घेणे, अश्लील मेसेज / क्लिप्स पाठवणे, गुड मॉर्निंग- गुडनाइट वगैरे सुरुवात करून फारशी ओळख नसतानादेखील तिच्या खासगी आयुष्यात शिरकाव करायला पाहणे, या गोष्टी घडणार हे आता गृहीत धरावे लागते. अशा वेळी फेक अकाउंट रिपोर्ट करणे, संबंधित व्यक्तीला अनफ्रेंड/ ब्लॉक करणे, वेळप्रसंगी सायबर सेलची मदत घेऊन अशा प्रवृत्तींना चाप लावणे, हे स्त्री लेखिकांना जाणीवपूर्वक करावे लागते.
४. या माध्यमांवर स्वलेखनाचे हक्क सुरक्षित राहण्याचा कायदेशीर ठोस मार्ग उपलब्ध नाही. माझ्या एका मैत्रिणीने लिहिलेली कथा १० वेगवेगळ्या अकाउंट / पेजवरून तिच्या नावाशिवाय शेअर झाली. मैत्रीण ते रिपोर्ट करण्याखेरीज काही करू शकली नाही. अकाउंट रिपोर्ट करण्याच्या वेळात ती पोस्ट अजून २० ठिकाणी शेअर झाली. कायदे असले, तरी ते अजून मजबूत नाहीत; पण त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
५. 'मैं तुम्हे लाइक दूंगी, तुम मुझे कंमेंट दो,' अशा स्वरूपाची देवाणघेवाण हा घातक प्रकार. हे फक्त माध्यम आहे हे विसरून, ते शस्त्र म्हणून वापरले जाते आणि खासगी गोष्टी चव्हाट्यावर येतात. यात बघ्याची भूमिका घेणारे असतात तसेच दोन्ही बाजूनी बोलणारेही असतात.
आभासी जगातले व्यक्त होणे आणि खासगी आयुष्यातले वागणे, यातील सीमारेषा धूसर होऊ न देणे, हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त आव्हानात्मक ठरते. ही सगळी आव्हाने पेलून येत्या काळात स्त्रिया जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत राहतील आणि अशी नवनवीन माध्यमे त्यांना खुणावत राहतील हे निश्चित.
- नेहा लिमये 
(पूर्वप्रसिद्धी :- महाराष्ट्र टाइम्स - मैफल पुरवणी - १३ एप्रिल २०१८)
https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/the-thing-to-write-online/articleshow/63739217.cms

ऑडिओ बुक लिंक ५- रसिया

माझ्या आवाजातील ऑडिओ बुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - 
 

"रसिया "

http://bookhungama.com/rasiya-audiobook/

रसिया हा एक प्रवास आहे...एका मनाच्या अंतरंगातला. तसे ते निबिड आरण्य आहे....लेखिकेने त्यातून प्रवास केलेला आहे...आणि आता ती आपल्याला आवाहन करीत आहे,“या माझा हात पकडा आणि आपण ह्या अरण्यातून प्रवास करून मनाचे किती कंगोरे आपल्या हाती सापडतात ह्याचा शोध घेऊया"... 
लेखिका - सुनीता झाडे 
अभिवाचक  : नेहा लिमये  



ऑडिओ बुक लिंक ४ - तिळगुळ

माझ्या आवाजातील ऑडिओ बुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
 
"तिळगुळ"

http://bookhungama.com/tilgul-es-1152/

लेखिका : आरती देशमुख 

अभिवाचक : नेहा लिमये


ऑडिओ बुक लिंक ३- माऊ

माझ्या आवाजातील ऑडिओ बुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -

"माऊ - भाग २ आणि ३" 





http://bookhungama.com/Mau-Part-2/
http://bookhungama.com/Mau-Part-3/

हा एक प्रवास आहे..ते तिचे भेतात....मित्र होतात...आणि माऊमध्ये गुंतत जातात. आता ते तिघे भिन्न ठिकाणी आहेत. भिन्न जातात. पण त्यांना त्या सुंदर आठवणी पुन्हा जगायच्या आहेत. त्याच्यासाठी पत्र हे एकच माध्यम ते निवडतात. एकमेकाना पत्रातून आठवणी जागवत भेटत राहायचे ते ठरवतात. त्यातून एक वैचारिक आणि भवानीक प्रवास सुरु होतो... कुठे घेऊन जातो तो प्रवास त्यांना...?

लेखक : विक्रम भागवत 
अभिवाचक : विक्रम भागवत आणि नेहा लिमये 





ऑडिओ बुक लिंक २ - Published Unpublished -Short Stories


माझ्या आवाजातील ऑडिओ बुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -

"Published Unpublished"

लेखक : उमेश पटवर्धन 
अभिवाचक : नेहा लिमये

http://bookhungama.com/Published-un-published-audiobook/


ऑडिओ बुक लिंक १ - बुचाची फुले


माझ्या आवाजातील ऑडिओ बुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -

बुचाची फुले - लेखिका आणि अभिवाचक : नेहा लिमये

http://bookhungama.com/Buchachi-Fule/



Friday, November 23, 2018

बुचाची फुले - एक प्रवास


"बुचाची फुले" ही पत्रमालिका बुक हंगामा संचालित "न लिहिलेली पत्रे" या फेसबुक पेजवर २०१७ आणि २०१८ दरम्यान दर शनिवारी प्रसिद्ध होत असे.  औरंगाबाद येथे झालेल्या 'दुसऱ्या नुक्कड डिजिटल साहित्य संमेलनात" लोकप्रिय मालिकेसाठी "बुचाची फुले"ला ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. 

वाचकहो , 

जवळ जवळ दीड वर्षे चालू  असलेल्या या प्रवासाचा मी व्यक्तिशः खूप आनंद घेतला. 


ही पत्रमालिका लिहायला घेताना धाकधूक होती कारण इथे मध्यवर्ती सूत्र असे काही नव्हते
असलेच तर फक्त दोन जीवांचा आठवणींचा प्रवासत्यांच्यातले हितगूज होतेमग बुचाची फुले हेच नाव का?


तर, बालपणीपासून मी जिथे ज्या जागी गेले तिथे मला बुचाची झाडे भेटत गेलीत्या फुलांचे घोस पाहून 
आणि त्यांचा दरवळ हुंगला की नेहेमी वाटायचेयांचे आणि आपले कुठल्यातरी जन्माचे नाते आहे.
मी त्यांच्याशी संवाद साधू शकतेथोडक्यात ही फुले "माझीआहेत
तसाच हा संवाद माझा माझ्याशी आहेम्हणून पर्यायाने आणि ओघाने "बुचाची फुलेहेच नाव मनात आले.

वाचकांनी या मालिकेला भरघोस प्रतिसादप्रतिक्रिया दिल्या
काहींशी अतिशय जवळचे बंध निर्माण झाले.
'शनिवारी पत्र नसले तर चुकल्यासारखे वाटतेअशीही प्रतिक्रिया आली तेव्हा आत काहीतरी हलले 
आणि जबाबदारी वाढली असे वाटले

मी त्यात किती खरी उतरले माहीत नाहीपण हा संवादु "शब्देणहोता 
त्यामुळे शब्दांची आणि वाचकांची मी शतशः ऋणी आहे.

विक्रम काका आणि  लिहिलेली पत्रे यांच्या ऋणात मी नेहेमीच आहे आणि असेन
काका नसते तर हा साठीचा टप्पा मी गाठला नसतात्यामुळे विशेष लोभ

अखेरबुचाची फुले सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देत राहोत असे म्हणून मी थांबते

स्नेहांकित,
नेहा

बुचाची फुले # ६०


मनू

काही वाटा समांतर असल्या तरी नेहेमीच सोबत असतात. भलेही त्या एकमेकांत मिसळत नसतील, नव्हे त्यांना तसे मिसळावे वाटले तरी ते नियतीला मान्य नसेल कदाचित. पण तरीही त्यांचा प्रवास थांबत नाही. आपापले वेगळे अस्तित्व सांभाळत त्या एकमेकांना सोबत करत चालत राहतात. नागमोडया वळणांवर त्या स्वतःला समजूतदारपणे सोपवून मोकळ्या होतात. वाटेतल्या अडथळ्यांना वळसा घालून पुन्हा चालू लागतात

अशी अबोल, समजूतदार सोबत किती जणांच्या नशिबात असेल मनू? आणि असली तरी ती कितीशी वाट्याला येत असेल, हे ही एक कोडेच.

आपला पत्र-प्रवास काहीसा असाच नाही? मी काही सांगण्याआधी ते तुला पोचावे आणि तू काही लिहिण्याआधी मलाहे शेवटले पत्र लिहिताना सुद्धा तू इथेच आहेस हे जाणवते आहे.....हा भास नक्कीच नाही. तू सूक्ष्म रूपाने इथे असतेस हा ठाम विश्वास आहे माझा. खरे ना?

एकटेपणा कुणाला चुकलाय मनू? तुझा एकटेपणा वेगळा आणि माझा वेगळा. पण त्या एकटेपणात ही अशी सोबत असली की आयुष्य बुचाचे झाड होते आणि ही पत्रे, ते सोबत चालणे, यो प्रवास, सगळ्या आठवणी बुचाची फुले होऊन जातात

हा आठवणींचा प्रवास कधीच संपू नये असे वाटते, नव्हे, तो संपणार नाहीच....जोवर बुचाची फुले आहेत तोवर. हो ना??

(बुचाच्या फुलांमध्ये तुला पाहणारा तुझा) रे

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

बुचाची फुले # ५९


रे

आत्ता विमानात बसले आहे. विमान प्रवासाची एक वेगळीच गंमत असतेआजूबाजूला निळभोर आकाश, त्यात पांढुरके ढगांचे पुंजके, दूरवर नजर टाकली तर ढगांच्या पायऱ्या असलेला रस्ता, खाली पाहावं तर सगळा लिलीपुटचा प्रदेश , आपल्या आजूबाजूला अर्धवट पेंगुळलेली माणसं, आईच्या खांद्यावर झोपी गेलेली गोड बाळं, सेवेला तत्पर हवाई सुंदऱ्या, लॅपटॉप आणि बाकी गॅजेट्स मध्ये रममाण झालेलं कॉर्पोरेट विश्व. सगळंच एखाद्या स्वप्नासारखं

मला नेहेमी वाटतं, कसं काय कळतं त्या वैमानिकाला की अमुक एका ढगावरून गेलो की डावीकडे वळायचं आहे, खाली नदी किंवा कालवा आला की अमुक एक ठिकाण आलं बुवा. कमाल आहे नाही. मला सगळे ढग सारखेच दिसतात, मुळात आकाशातले रस्ते आणि ट्रॅफिक हा विषयच आपल्या डोक्यात कधी येत नाही. वैमानिक रस्ता विसरत असेल का रे कधी? आणि विसरला तर त्याला सूचना मिळतील त्या ऐकून तो परत योग्य रस्त्याला लागत असेल का हे आपले माझे वेडीचे भाबडे प्रश्न

जिकडे तिकडे बर्फाळ प्रदेश असावा त्याप्रमाणे आत्ता ढगांचं साम्राज्य आहे विमानाभोवती. जमीन , समुद्र , नदी, झाडं, माणसं दिसायचं नाव नाही. अवकाशाची पोकळी, ढग आणि आपण - विमानाला चकवा लागला नाही ना अशी शंका यावी इतकं अंतर हे असंच पार करणं चालू आहे

मला या ढगांचे निरनिराळे आकार दिसतायत, दोन ढग एकत्र येऊन विलग होताना दिसतायत, ढगांची एक लांबलचक पट्टी आकाशाचा कॅनव्हास व्यापून टाकताना दिसतेय. मग फक्त ढगच, आकाश सुद्धा नाही. व्यापून राहणारा पांढरा रंग, जणू कापसाची दुलईच. मला यात लुप्त व्हावंसं वाटतं आहे. सगळ्या चिंता, धडपड, गोंधळ , दुःख मागे ठेवून त्या दुलईत लपून बसावं आणि सापडूच नये. खूप शोधावं आपल्याला माणसांनी आणि मग आपण हळूच बाहेर येऊन त्यांना वेडावून दाखवावं, त्यांचा सात्विक संताप गालातल्या गालात हसून झेलावा आणि मनात असे जिवलग दिल्याबद्दल देवाचे आभार मानावे

पण कसलं कायढगांची पट्टी मागे पडून, विमान खाली जायला सुरुवात होते आणि लिलीपुटचा प्रदेश परत दिसायला लागल्यावर हे स्वप्नरंजन थांबतं. तेवढ्यात हवाई सुंदरी येऊन सीटबेल्ट लावा सांगून जाते

प्रत्येक वेळी लँड होताना सीटबेल्ट बोचतोच, बघ !

म्हणूनच, एअरपोर्ट जवळ एखादे तरी बुचाचे झाड आहे का हे माझी नजर आपसूक शोधत राहते.

(सगळी विमाने तुझ्या गावावरून का जात नाहीत - इति) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

बुचाची फुले # ५८


रे 

आतडे पिळवटवून टाकणारी वेदना असेल आणि गंतव्य-स्थान जवळ आल्याची जाणीव झाली की माणूस आपसूक प्रार्थनेकडे वळतो. एक प्रकारे वेदना ही प्रार्थनेची जननीच म्हणायची का रे? म्हणजेएरवी माणूस प्रार्थना करत नाही असे मुळीच नाही ; पण त्यात शरण भावापेक्षा आत्मसंतुष्टी करण्याचा हेतू जास्त असतो. म्हणजे मला हे हवे आहे, म्हणून मी देवाजवळ साकडे घातले. यात माणूस स्वतःला विसरून देवाला महत्व देतोय असा आभास असतो फक्त. तो समर्पित होत नसतो. हे समर्पण माणसाला स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला वेदनेतून जाताना बघत असतानाच येते. या अशा प्रार्थनेत एक प्रकारची निराशा, हताश स्थितीअसते. जे आहे ते स्वीकरण्यावाचून गत्यंतर नसते आणि तरीही मनात एक अंधुकशी आशा पालवत राहते, की काहीतरी चमत्कार होईल , हे सगळे पूर्ववत होईल आणि वेदनेचा अंत होईल

ही निराशा, भयभीती अंतिम क्षणाची नसतेच मुळीतो अंतिम क्षण ज्या प्रकारे चालून येत असतो आणि कणा- कणाने सगळे गिळंकृत करत असतो त्याची असते.  कालपर्यंत सुरळीत चालू असलेले सगळे नुसतेच थांबत नाहीत तर "सगळेच किती क्षणभंगुर आहे आणि आपण वेड्यासारखे हे शाश्वत समजून चाललो होतो, नाचत होतो" अशी क्रूर जाणीव होते. सगळे आयुष्य त्या एका क्षणाभोवती फिरते. भोगणारा वेदना भोगतोच , पण बरोबर असणाराही दुपटीने भोगतो. शेवटी, त्या परम तत्वाला शरण जाणे, प्रार्थनेतून स्वतःला समजावणे हे येतेप्रार्थनेतून बळ मिळते - स्वतःला समजावण्याचे , परिस्थितीचा स्वीकार करण्याचे. जे क्षण हातात आहेत ते शक्य तितक्या उत्तम रित्या जगण्याचे आणि जवळच्या व्यक्तीबरोबर ते क्षण तन्मयतेने व्यतीत करण्याचे. सगळ्या परिस्थितीकडे स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहून त्यातून उभे राहण्याचे, वेदनेशी समझोता करण्याचे अवसान अंगी येते

पण मग त्या प्रार्थनेचाही कधी कधी परिणाम दिसत नाही. आणि खरे पाहता, वेदनेनंतरची ही "प्रार्थनेचा काही परिणाम होण्याची" वेदना जास्त वेदनादायक असते. त्या वेदनेचे काय करायचे हे कुणालाच माहीत नसते. मग फक्त प्रश्न उरतातचहातचे सगळे निघून जाणार असेलच तर प्रार्थना काय कामाची ? आणि असे सगळे निसटल्यावर त्या प्रार्थनेचे काय होते ? विश्वास उरतो त्या प्रार्थनेवर , तिच्या शक्तीवर ?  मग जर का प्रार्थना फळाला येणार नसेल तर ती का करावी

केलेली प्रार्थना फळाला यावी यासाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करावी का ? आणि प्रार्थनेची प्रार्थना कुठे नेते आपल्याला ? तिचे पुढे काय होते ? सगळ्या प्रार्थना काळाच्या उदरात विरून जातात की गंतव्याच्या किनाऱ्यांवर काही पाऊलखुणा सोडून जातात

जागेपणी वेदना भोगणाऱ्या जिवाच्या चेहेऱ्यावर चिरनिद्रेच्या आधीन होताना हास्य कसे येते ? कसले समाधान असते ते? सगळ्यांना चुकवून निघून जाण्याचे, वेदनेपासून सुटका मिळाल्याचे आणि जवळच्या व्यक्तीला ती सुटका बहाल केल्याचे की आणखी कसले

काही उत्तरे शोधताना सुद्धा मनावरच्या खपल्या निघून दुःख वाहू लागते आणि वेदनेचे कढ उरी दाटतात. अशा वेळी मी पुन्हा निरांजनाची वात सारखी करायला सरसावते

काहीही असो, पण अंधाराच्या सावल्यांमध्ये वावरताना ही प्रार्थनेची शलाका लामणदिव्यासारखी तेवत राहते खरी !!! 

(प्रार्थनेलाच शरण जाऊ पाहणारी) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/